ललित मोदींना मदत केल्यामुळे परराष्ट्रमंत्री अडचणीत
- ७०० कोटीच्या आयपीएल गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी ललित मोदींना व्हिसासाठी मदत केल्याच्या मुद्द्यावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अडचणीत आल्या आहेत.
- ललित मोदी यांची पत्नी कर्करोगाने आजारी असल्याने त्यांना पोर्तुगाल येथे जाण्याची परवानगी देण्यासंदर्भात शिफारस करण्याची विनंती स्वराज यांनी ब्रिटीश लोकप्रतिनिधी केथ वाझ यांना केली होती.
- ही मदत मानवतावादी दृष्टिकोनामधून केल्याचा खुलासा सुषमा स्वराज यांनी केला असला तरी कॉंग्रेसने आक्रमकपणे सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी करत पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केले.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने (भाजप) मात्र स्वराज यांना स्पष्ट पाठिंबा दर्शविला.
‘मोबाईल ब्लड बॅंक’ ऍप
- केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त (१४ जून) ‘मोबाईल ब्लड बॅंक’ ऍप ची सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.
- ‘मोबाईल ब्लड बॅंक’ ऍपमुळे जवळ असलेल्या ब्लड बॅंकेची माहिती मिळण्यास सोपे जाणार आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमन परिषदेनी परवानाधारक असलेल्या २७६० ब्लड बॅंकांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. या ब्लड बॅंकांची माहिती राष्ट्रीय आरोग्य पोर्टलवर उपलब्ध आहे.
- स्लोगन : ‘थॅंक यू फॉर सेव्हिंग माय लाइफ’
डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानाची ४० लाख पौंडांना खरेदी
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील निवासस्थानाच्या खरेदीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली असून, भारत सरकारने ही वास्तू खरेदी करण्यासाठी ४० लाख पौंड खर्च केले आहेत.
- विद्यार्थीदशेमध्ये १९२०च्या दशकात डॉ. आंबेडकर यांचे या घरामध्ये वास्तव्य होते. येथील ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेमध्ये डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतले होते.
- डॉ. आंबेडकरांचे हे निवासस्थान भारत सरकारने खरेदी करावे यासाठी लंडनमधील ‘फेडरेशन ऑफ आंबेडकराईट्स अँड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन’ (फॅबो) या संस्थेने सरकारदरबारी पाठपुरावा केला होता.
- २०५० स्क्वेअर फूट एवढ्या विस्तीर्ण भागावर असलेली वास्तू पूर्वीपासूनच अनेकांच्या आकर्षणाचा बिंदू होती. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने या निवासस्थानाच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
‘पीकविमा योजना’ यावर्षी १२ जिल्ह्यांत आणि ७ पिकांसाठी
- खरीप हंगामातील हवामानावर आधारित ‘पीकविमा योजना’ यावर्षी १२ जिल्ह्यांत आणि ७ पिकांसाठी राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.
- कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी ३० जून २०१५ ही अंतिम तारीख असल्याचे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले.
- अपुरा पाऊस, पावसातील खंड आणि अतिपाऊस या धोक्यापासून संरक्षण देऊन पिकांचे नुकसान झाल्यास योजनेच्या तरतुदीप्रमाणे शेतकऱ्यांना विमासंरक्षण देणे; तसेच पिकांच्या नुकसानीच्या स्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- प्रत्येक पीकनिहाय हेक्टरी विमा संरक्षित रक्कम निश्चित केलेली आहे. त्या विमा हप्त्यामध्ये ५० टक्के अनुदान केंद्र व राज्य सरकारमार्फत देण्यात येत असून, उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी बॅंकेत भरून योजनेत सहभागी व्हायचे आहे.
- या योजनेतंर्गत नुकसान भरपाई ठरविण्यासाठी स्वयंचलित संदर्भ हवामान केंद्रात नोंद झालेल्या आकडेवारीचा वापर केला जाईल. त्यातून देय होणारी नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम संबंधित विमा कंपनीमार्फत देण्यात येईल.
- योजनेसाठी निवडलेले विभागनिहाय जिल्हे
कोकण : ठाणे, रायगड
नाशिक : जळगाव, नगर
पुणे : सातारा, सांगली
औरंगाबाद : लातूर, नांदेड
अमरावती : अमरावती, यवतमाळ
नागपूर : नागपूर, वर्धा
- निवडलेली पिके : भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस
पुलित्झर विजेते जॉन कॅरोल यांचे निधन
- ‘लॉस एंजलिस टाइम्स’चे माजी संपादक आणि पुलित्झर पुरस्कार विजेते जॉन कॅरोल यांचे १४ जून रोजी वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले. कॅरोल यांनी पाच वर्षे ‘लॉस एंजलिस टाइम्स’चे संपादक पद सांभाळले होते.
- याकाळात त्यांना १३ वेळा पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. शेवटच्या वर्षांमध्ये त्यांना तब्बल सातवेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पत्रकारितेत ४० वर्षे ते कार्यरत होते. २००५मध्ये त्यांनी ‘लॉस एंजलिस टाइम्स’च्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता.
पेपर फुटल्याने ‘एआयपीएमटी’ परीक्षा पुन्हा होणार
- आधी घेण्यात आलेली ऑल इंडिया प्री-मेडिकल एंट्रन्स टेस्ट (एआयपीएमटी) ही राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश पात्रता परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने १५ जून रोजी रद्द केली. केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ही परीक्षा चार आठवड्यांत पुन्हा घ्यावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
- देशभरातील सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांनी ३ मे रोजी ही परीक्षा दिली होती. परंतु, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या आणि मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरून या प्रश्नांची उत्तरेही दहा राज्यांतील अनेक केंद्रांवरील विद्यार्थ्यांना मिळाली होती. त्यामुळे न्यायाधीश आर.के. अगरवाल, अमिताभा रॉय यांच्या खंडपीठाने ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले.
- पुन्हा परीक्षा घेण्याला ‘सीबीएसई‘ने सुरवातीला विरोध दर्शविला होता. महान्यायवादी रणजीत कुमार यांनी सीबीएसईची बाजू मांडताना सांगितले की, केवळ ४४ विद्यार्थ्यांनी चुकीच्या मार्गांचा वापर केल्याने ६ लाख ३० हजार विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायला लावू शकत नाही.
- त्यावर न्यायलयाने सांगितले की, याची आम्हाला जाण आहे, परंतु परीक्षेचे पावित्र्य संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. असे प्रकार झाल्यास परीक्षा पुन्हा घेण्याशिवाय पर्याय नाही असा संदेश गेला पाहिजे.
बोपन्ना-मर्गीआ जोडीला जेतेपद
- रोहन बोपन्ना आणि फ्लोरिन मर्गीआ या चौथ्या मानांकित जोडीने एटीपी मर्सिडिस चषक टेनिस स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावावर केले. त्यांनी तिसऱ्या मानांकित ब्राझीलच्या ब्रुनो सोआरेस आणि ऑस्ट्रियाच्या अॅलेक्झांडर पेया या जोडीचा पराभव करून सत्रातील दुसरे जेतेपद पटकावले.
- भारत-रोमानिया जोडीने अंतिम फेरीत ०-१ अशा पिछाडीवरून पुनरागमन करत १ तास ११ मिनिटे चाललेल्या सामन्यात ५-७, ६-२, १०-७ अशी बाजी मारली. बोपन्ना-मर्गीआ जोडीने गतमहिन्यात माद्रिद मास्टर्सचे जेतेपद पटकावले होते. बोपन्नाचे हे सत्रातील वैयक्तिक चौथे जेतेपद आहे.
!!! जय महाराष्ट्र !!!